Tuesday, January 8, 2008

पाकिस्तानात संगीताला विरोध म्हणजे आटे में नमक

राजकीय आणि सामाजिक समस्या पाकिस्तानात नेहमीच भेडसावत राहिल्या आहे. आता तेथील सांस्कृतिक क्षेत्राला मूलतत्त्ववाद्यांपासून धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील संगीत क्षेत्राची स्थिती नेमकी कशी आहे, याविषयी प्रख्यात गझल गायक मेहदी हसन यांचे चिरंजीव असिफ मेहदी यांच्याशी केलेली ही बातचीत. असिफ मेहदी सध्या पाकिस्तानहून पुण्यात आलेले आहेत.



  1. - भारत-पाक फाळणीनंतर या देशांचे परस्परांविषयीची दृष्टिकोन बदलले आहेत. त्याप्रमाणे संगीत क्षेत्रही बदलले आहे का, तेथील सांगीतिक माहोलमध्ये काही फरक पडलाय का?:


संगीताची उत्पत्ती हीच मुळात भारतात झाली आहे. पाकिस्तानचेही तसेच आहे. त्यामुळे संगीतात फारसा बदल झालेला नाही. भारतात जे शास्त्रीय संगीत-रागरागिण्या आहेत. त्याच तिथे आहेत. परंतु भारतात संगीताला "मजाक' समजलं जात नाही. यासंदर्भात मला भारत आणि पाकिस्तानच्या संगीतात थोडा फरक जाणवतो. बाकी सगळं सारखंच आहे. माहोलही सारखच आहे.





  • - भारतात संगीत आणि कलाकाराला भरपूर मानसन्मान मिळतो. तसा पाकिस्तानात मिळतो का? संगीत क्षेत्राकडे पाहण्याचा सरकार आणि लोकांचा दृष्टिकोन कसा आहे?


पाकिस्तानमध्येही खूप आवडीनं संगीत ऐकलं जातं. त्यामुळे जनता आणि सरकारकडूनही प्रोत्साहन दिलं जातं. मानसन्मान मिळतो. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे मेहदी हसन आहेत. तिथे आजही ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.





  • - गझल गायकी हा उपशास्त्रीय संगीताचा प्रकार आहे. पण सध्या त्याला "सुगम संगीता'चं स्वरूप आलंय. याबाबत आपलं मत काय आहे?


तुम्ही म्हणता ते खरं आहे. आज काल गझल म्हणून जे गायले जाते त्याला गझल नव्हे; गीत म्हणायला हवे. गझलचा जो "मिजाझ' आहे त्यात भाव, शब्द आला महत्त्व आहे. शास्त्रीय संगीताची जानकारी असणेही तेवढेच आवश्‍यक आहे. ही जानकारी नसेल तर गझलेचा भावार्थ लोकांपर्यंत पोचविता येणारच आहे. आज जे गायलं जात आहे, ती गझल नाही, असंच मी म्हणेल.





  • आजचं संगीत "ग्लोबल' झालंय. फ्युजनचा जमाना आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत किंवा आशियायी संगीत यात पॉप, रॉक आदींचा वापर वाढू लागला आहे. याचा शास्त्रीय संगीतावर काही परिणाम होईल, असे आपल्याला वाटते का?


शास्त्रीय संगीतावर कोणताच परिणाम होणार नाही. कारण शास्त्रीय संगीत सत्य आहे. सत्य हे चिरंतन असते. संगीत क्षेत्रातील "फ्युजन' निश्‍चितच चांगले आहे. त्यातून चांगलं संगीतच आपल्याला मिळेल, असं माझं मत आहे. एक उदाहरण देतो. पूर्वी उपचारासाठी संगीताचा वापर केला जायचा-आजही केला जात आहे. माझे आजोबा इस्माईल खॉं हे "जिल्फ' नावाचा राग गाऊन लहान मुलांची पोटदुखी बरी करायचे. भारतात इंदूर संस्थान होते. या संस्थानच्या महाराजांच्या पुतणीला कर्करोग होता. एका संगीतकाराने तानपुऱ्याच्या झंकाराने तिला बरे केले. संगीताचं हे माहात्म्य आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीत कधीही लोप पावणार नाही.





  • - पाकिस्तानात काही लोकांना संगीत मान्य नाही, असं बातम्यांमधून ऐकायला वाचायला मिळतं. सत्य काय आहे? आपण याबाबत काय विचार करता?


हे खरं आहे. पाकिस्तान हा इस्लामिक देश असल्याने तेथे अनेक लोक गायन-वादनाला चांगलं मानत नाहीत. परंतु लोकप्रियतेचा विचार केला तर तेथील नव्वद टक्के लोकांना संगीतात रस आहे. या प्रमाणातच आम्हालाही तिथे प्रतिसाद मिळतो. संगीत मान्य नाही, असे खूप कमी लोक आहेत. त्यांच्या तीव्रता "आटे में नमक' अशी आहे. या लोकांच्या विरोधामुळे पाकिस्तानातील संगीत कमी झालेले नाही. किंबहुना त्यात वाढच झाली आहे.





  • - अशा लोकांच्या विरोधामुळे संगीतकार, गायक यांच्यावर पाकिस्तान सरकारकडून बंधने लादली जातात का?


अजिबात नाही. उलट कलाकारांना प्रोत्साहन देणे, हे तेथील सरकारचे धोरण आहे.





- संतोष शाळीग्राम


No comments: