Tuesday, December 11, 2007

आजच्या "पुढारलेल्या' जमान्यात संगीत कला आत्मसात करणं खूप सोपं झालंय. म्हणजे फारसं अवघड राहिलेलं नाही, नाही का? पूर्वी ही कला आत्मसात करण्यासाठी कोण कष्ट पडत होते. त्यासाठी काय काय करावे लागे, याचे किस्से वाचले की वाटतं. खरच पूर्वीच्या गायक, वादकांनी अतोनात कष्ट केले म्हणून तरी आपल्याला आज काही चांगलं ऐकायला मिळतं. तेव्हा जर का आजच्या सारखी गल्लीबोळात संगीत विद्यालये असती, तर आपण आज कुणाला "मोठी माणसं' म्हटलो असतो. हा खरं तर माझ्यापुढचा प्रश्‍न आहे. याचं उत्तर तुमच्याकडं असेल तर आवश्‍य कळवा. उत्तराचे मानधन खाली दिलेले आहे; किश्‍श्‍यांच्या रुपात...

मारवा आणि वसंतराव देशपांडे

नदीकाठची शांत सायंकाळ. सूर्य मावळतीकडे निघालाय. त्याच्या तांबूस प्रभेने आसमंत व्यापावा. त्याचवेळी मारव्याचे स्वर कानी पडावे... शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्या प्रत्येकाला मुग्ध करणारा हा माहौल! संध्याकाळ आणि मारवा हे जसं समीकरण आहे तसं मारवा आणि पं. वसंतराव देशपांडे हेही सूत्र आहे. गाणं शिकण्यासाठी पं. वसंतराव देशपांडे पतियाळा घराण्याचे उस्ताद असदअली खॉं यांच्याकडे गेले. खॉंसाहेब त्यावेळी लाहोरमधील एका दर्ग्यात राहात असत. एक पैसा दिला की त्यांच्याकडून एक चीज मिळत असे. वसंतरावांनी अशाप्रकारे चाळीस चीजा मिळविल्या. ही गोष्ट त्यांनी अभिमानाने आपल्या मामाला सांगितली. पण मामानं वसंतरावांनाच सुनावलं, ""खरं गाणं शिकायचं असेल तर ही वही पहिली जाळून टाक आणि खॉंसाहेबांचा गंडा बांध.'' मामा एवढे सांगून थांबला नाही, तर त्यांनी वसंतरावांना दोन रुपये दिले. त्यांनी या दोन रुपयांतून गांजा, शुद्ध तुपातील मिठाई असं सामान बरोबर नेलं. गुरुउपदेशाचा राग म्हणून खॉंसाहेबांनी सायंकाळी त्यांना मारवा शिकविण्यास सुरवात केली. पुढे चार-पाच महिने वसंतरावांनी खॉंसाहेबांकडून फक्त मारव्याचीच तालीम घेतली. तेव्हापासून वसंतराव आणि मारव्याचं नातं दृढ झालं.

1 comment:

Unknown said...

वा! कल्पना सुरेख आहे. शुभेच्छा.