Saturday, July 12, 2008

आव्हान आहे अभिजातता जपण्याचं



""गेल्या पंचवीस वर्षांच्या तुलनेत संगीतक्षेत्र अधिक विस्तारले आहे. शास्त्रीय संगीताचा प्रवाहदेखील अखंडित आहे. फक्त त्याची अभिजातता टिकविणे, हे मोठं आव्हान आहे. ते पेलण्याची जबाबदारी केवळ कलाकाराचीच आहे.''
प्रख्यात शास्त्रीय गायक शौनक अभिषेकी यांची मुलाखत घेण्याची योग आला. शास्त्रीय संगीताविषयी आपली मते त्यांनी ठामपणे मांडली. मुलाखतीचे स्वरूप प्रश्‍नोत्तरी असले, तरी प्रश्‍न वाचण्याचा जाच नको म्हणून उत्तरांची सुसूत्र बांधणी करून लिहिलेला लेखबंध...

शास्त्रीय संगीत हे नेहमीच मर्यादित स्वरूपाचं राहिलं आहे. यापुढेही ते मर्यादित स्वरूपाचंच राहील. कारण सवाई गंधर्वसारखे फार कमी कार्यक्रम असतात. ज्यात दहा-पंधरा हजार रसिक एकावेळी संगीताचा मजा घेऊ शकतात; परंतु मैफलीत मोजके लोक आणि कलाकार यांच्यात "इंटरॅक्‍शन' होते. एक भावबंध तयार होतो. मोठ्या कार्यक्रमांमधून तो तयार होईलच, असे नाही म्हणूनच शास्त्रीय संगीत मैफल स्वरूपातच राहील. त्याचं एक कारण आहे. शास्त्रीय संगीताचा बंध अध्यात्माशी आहे. बाबा (पं. जितेंद्र अभिषेकी) सांगायचे जो वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आहे, तोच शास्त्रीय संगीताची लज्जत घेऊ शकतो. सर्वसाधारण पुस्तके, कादंबऱ्या कुणीही वाचतो; पण ज्याला शेक्‍सपिअर किंवा कालिदास वाचायचा आहे, त्याला प्रथम आपली वैचारिक बैठक तयार करावी लागते. शास्त्रीय संगीताचंही तसंच आहे म्हणूनच या संगीताला मिळणारा प्रतिसाद ठीक आहे.
माध्यमांमुळे आता संगीतक्षेत्राला इतकं एक्‍स्पोजर मिळालं आहे, की संगीताच्या इतर धारांप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकांचा प्रतिसाद मिळावा, असं वाटतं. पण शास्त्रीय संगीताच्या मैफलीसाठी आवश्‍यक संवादी आंतरक्रियेच्या मर्यादेमुळे तसं होणार नाही. नवी पिढी शास्त्रीय संगीत आत्मसात करण्याचा-ऐकण्याचा प्रयत्न करते आहे. मी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेरही फिरतो. त्यावरून तरी मला सध्याचे चित्र आशादायी वाटतं.
पूर्वी पं. जितेंद्र अभिषेकी, भीमसेन जोशी, कुमारगंधर्व अशी मोजकी नावे लोकांसमोर होती. "एचएमव्ही' ही एकच कंपनी होती. त्यामुळे कलाकाराची एक रेकॉर्ड निघाली तरी त्याचं नाव देशभर व्हायचं. आज माध्यमांमुळे अनेक लोक संगीतक्षेत्राकडे वळल्याने चांगलं काय, वाईट काय - काय ऐकायचं, असा प्रश्‍न लोकांसमोर आहे. त्याचा परिणाम शास्त्रीय संगीताला ज्या कलाकारांनी वाहून घेतलं आहे, त्यांच्यावर होतो. प्रायोजक संस्थाही नावाजलेल्या कलाकाराचेच कार्यक्रम आयोजित करणे पसंत करतात. मग प्रश्‍न असा पडतो की नव्या पिढीतील जे कलाकार शास्त्रीय संगीताची सेवा करतात, त्यांना स्टेज कसं मिळायचे. साधनेसाठी त्यांनी काही वर्षे घालविली, याचा विचार कोण करणार? एखाद्या कलाकाराचे नाव झाल्यानंतरच लोक त्याला पैसे देणार का? कलाकाराला त्याच्या साधना-संघर्षाच्या काळात उत्तेजन, आर्थिक पाठबळ मिळायला पाहिजे. तुलनेने माझ्या पिढीची स्थिती बरी आहे. पंधरा वर्षांपूर्वी, आम्ही "गाणं करतो म्हटलं की म्हणजे काय' असा प्रश्‍न यायचा. शास्त्रीय संगीत अशी एक कला आहे, की ती प्रत्येक गावात-शहरात जाऊन पेश करावी लागते. पहिला पंधरा वर्षांचा काळ कलाकारासाठी महत्त्वाचा असतो. त्याला साथ, मदत-आधार मिळणे आवश्‍यक आहे. या काळात तो झगडत-भोगत राहिला, तर पुढे त्या कलाकाराचे नाव मोठं झाल्यानंतर तो मनमानेल तसे मानधन मागेल आणि संघर्षाच्या काळात झालेल्या अत्याचाराचा सूड उगवेल. यात संगीतक्षेत्राची मोठी हानी होण्याचा धोका आहे. कलाकाराला आर्थिक सुरक्षितता मिळाली, तर संगीतक्षेत्रासाठी ते अधिक फलदायी ठरेल.
पूर्वीची गुरुकुल पद्धत खुंटल्याचा सध्या सूर उमटत आहे. ते बहुतांशी खरंही आहे. गुरुकुल पद्धतीला शास्त्रीय संगीतात पर्याय नाही. आजवर याच परंपरेतून कलाकार तयार झालेत. आजही अगदी छोट्या स्तरावर का होईना गुरूकुलाची परंपरा सुरूच ठेवली तर हिऱ्यासारखे कलाकार तयार होतील. बाबांनी सुरू केलेली गुरुकुल परंपरा मीदेखील पुढे सुरू ठेवली आहे.
सध्या लोकांचा कल मनोरंजकी कलांकडे असल्याने संगीत नाटकांची परंपरा खंडित झाली आहे. याला संगीतकारही तितकेच जबाबदार आहेत. पूर्वी लेखक-संगीतकार आणि निर्माता यांच्या वैचारिक देवाणघेवाणीतून संगीत नाटकांची निर्मिती केली जायची. संगीत नाटकाचा परिणाम पुढे किमान दहावर्षे जनमानसावर टिकून राहावा, हा विचार त्यावेळी केला जायचा. त्याच दृष्टिकोनातून संगीतकारही मेहनत घेऊन संगीत देत असत म्हणूनच ती नाटके आज लोकांच्या स्मरणात आणि त्यातील संगीत लोकांच्या ओठात आहे. आज लेखक, संगीतकार, निर्माते आपल्या "व्यवसाया'त मग्न झाल्याने त्यांच्यातील वैचारिक देवाणघेवाण पूर्णपणे थांबलेली आहे. त्यामुळेच अशाप्रकारची निर्मिती होत नाही.
नवी पिढी शास्त्रीय संगीताला प्रतिसाद देत आहे. फक्त या प्रतिसादाचा प्रवाह व्हायला हवा. हा प्रवाह निर्माण करण्याची जबाबदारी कलाकाराची आहे. बाबा, भीमसेन जोशी, किशोरी अमोणकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपलं नाव चाळीस वर्षे एकाच उंचीवर ठेवलं. रसिकांच्या प्रतिसादाचा त्यांनी प्रवाह निर्माण केला. तीच जबाबदारी आता आमच्यावर आहे. नव्या पिढीनेही आपल्या मुलांमध्ये सांगीतिक गुण असतील, तर त्याला पूर्णवेळ संगीत शिकण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. शास्त्रीय संगीत थांबलय का, या प्रश्‍नावर मी एक दाखला देतो. बाबांच्या काळातही आता शास्त्रीय संगीत काही तरणार नाही, असे लोक म्हणत. त्यानंतर पंधरा-वीस वर्षे गेली संगीत काही थांबलं नाही आणि थांबणारही नाही.

Friday, July 11, 2008

"रिऍलिटी'तील वास्तव

एका बंगाली दूरचित्रवाहिनीवरील नृत्यस्पर्धेत शिंजीनी नामक स्पर्धक मुलीला अपयशामुळे नैराश्याचा झटका आला. या स्पर्धेतील एक प्रसंग तिच्या जिवावर बेतला. यासंबंधीच्या बातम्या दूरचित्रवाहिनी आणि दैनिकांत झळकल्या आणि अशाप्रकारच्या सर्वच कार्यक्रमांना, निर्मात्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले. वस्तुतः ते चूक आहे. खरे तर या घटनेला शिंजीनीच्या कुटुंबीयांना जबाबदार ठरवायला हवे. आपल्या अपत्याला आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण किती धीर देतो, यावर मुलांची मानसिकता घडत असते. केवळ अतोनात लाड करून त्यांना हवे ते, हवे तेव्हा देऊन हट्टी बनविणे किंवा अपयश काय आहे, हेच त्यांना कळू देणार नसाल, तर अशा मुलांच्या वाट्याला शिंजीनीसारखीच अवस्था येणार. पालकांनी अशा मुलांना "रिऍलिटी शो'मध्ये ढकलू नये.कला कोणतीही असो, ती आत्मसात करण्यासाठी अपार मेहनत करावी लागते. त्यासाठी कष्टाळू वृत्ती मुलांमध्ये असायला हवी. ती काही उपजत नसते. "आई-बाबां'ना मुलांमध्ये ती निर्माण करावी लागते. कष्टाळू वृत्ती एकदा अंगी आली, की अपयश पचविण्याचा कसदारपणा मुलांमध्ये आपोआप निर्माण होतो. "प्रथम अपयश आणि नंतर यश' हे साधे सूत्र जरी मुलांच्या गळी उतरविले, तरी पुष्कळ आहे. परंतु "माझा मुलागा इतरांपेक्षा खूप हुशार आहे. यश घेऊनच तो जन्माला आलाय; अपयश त्याला माहीतच नाही, ' हे सांगण्याची चढाओढ सध्याच्या "आई-बाबां'मध्ये दिसते. मुलांकडे तटस्थ वृत्तीने पाहून त्यांच्यातील गुण-दुर्गुण ओळखण्याची "हिम्मत' पालकांकडे नसेल तर मुलेही तकलादू मनोवृत्तीची बनतील.कार्यक्रमांना दोष नकोकोलकत्याच्या शिंजीनीला "अक्यूट डिसएमिनेटेड एन्सेफेलो मियालिटीज' रोग जडल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. तिच्या कमकुवत मनोवस्थेमुळे तिला जास्त त्रास झाला. शिंजीनीच्या या अवस्थेबद्दल तिच्या कुटुंबीयांनी कुणालाही जबाबदार धरले नाही; पण प्रसारमाध्यमांनी मात्र "रिऍलिटी शो' आणि त्यातील परीक्षकांना धारेवर धरले. "रिऍलिटी शो'चा हेतू विविध क्षेत्रातील दडलेले "हिरे' शोधून काढण्याचा आहे. त्यात स्पर्धा असणारच! या शोद्वारे अमाप पैसा कमावला जातो हेही मान्य; पण नव्या कलाकारांना इतके सशक्त व्यासपीठ कुठे मिळू शकणार आहे? आताच्या दिग्गज कलाकारांना असे व्यासपीठ क्वचितच मिळाले असेल! हे वास्तव प्रत्येकानेच स्वीकारायला हवे. आणि स्पर्धा कुठे नसते? घरात सकाळी उठल्यानंतर दादू आधी अंघोळ करणार की ताई, बाबांनी खाऊ आणला की बच्चे कंपनी आधी मला, आधी मला करायला लागतात. इथपासून स्पर्धा सुरू होते. मुले वर्षभर शाळेत जातात. या काळात शाळेत होणाऱ्या स्पर्धेत ते भाग घेतात. शेवटी वार्षिक परीक्षा असते. (ही सुद्धा एक स्पर्धाच नाही का? ) स्पर्धा, परीक्षांमध्ये कमी मार्क्स मिळाले, अपयश आले तर ते स्वीकारले जाते. त्यावेळी शाळा, शिक्षणसंस्था, शिक्षकांना दोष दिला जातो का, याचाही प्रत्येकाने विचार करावा. मग "रिऍलिटी शो'ला दोष का? हे शो म्हणजे नवकलाकारांच्या आयुष्याला दिशा देणारे आहेत, असा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवायला हवा. कारण या शोमध्ये यशस्वी झालेल्या अनेकांना आपल्या जीवनाचा मार्ग सापडला आहे.
-

Thursday, January 31, 2008

यशस्वी पुरुषामागे स्त्री (चांगली की वाईट)



















प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, अशी शब्दावली प्रचलित आहे; पण सकारात्मक अर्थाने! याचा अनुभवही अनेकांना आला असेल. पण एखाद्याची बायको किंवा प्रेयसी खाष्ट असेल तर, तो पुरुष यशस्वी होणारच नाही का? यावर प्रत्येकाची मते भिन्न असू शकतात. नव्हे असतीलच, यात शंका नाही. पत्नी खाष्ट आणि तऱ्हेवाईक असेल तर पती यशस्वी होणारच नाही, असे कुणाचे म्हणणे असेल तर अब्राहम लिंकनच्या आयुष्यात डोकवा म्हणजे डोक्‍यातील भ्रम दूर होतील. कुणी म्हणेल हा अपवाद आहे... (ज्याचा-त्याचा प्रश्‍न!)अब्राहम लिंकनची पत्नी मेरी टॉड अशीच खाष्ट आणि तऱ्हेवाइक होती. राग, द्वेष, चीड, हाव हे सर्व "गुण' तिच्या अंगी होते. त्यामुळे तिची जीवनकथाही वैचित्र्यपूर्ण आहे. मेरीच्या अंगी असलेल्या या "गुणां'मुळे लिंकनला तोटाचा झाला असेल, असा दावाही कुणी करू शकते. काही बाबतीत तो खराही ठरेल. पण तिचा त्रास असूनही लिंकन अमेरिकाचा अध्यक्ष झाला, हीदेखील वस्तुस्थिती आहे. यावरून एकतर उपरोक्त शब्दावली बाद ठरवावी लागेल किंवा "कोणत्याही यशस्वी पुरुषामागे (चांगल्या/वाईट स्वभावाची) स्त्री असते' अशी शब्दावली रूढ करावी लागेल. असो. लिंकनच्या आयुष्यात डोकावले आहेच. त्याबाबत आणखी जाणून घेवू या.अब्राहम लिंकन हा अत्यंत गरीब होता. लाकूडतोड, शेतमजुरी, सुतारकी, बोटी धुणे, जमीनमोजणी, किराणा मालाचे दुकान चालविणे, असे अनेक धंदे त्याने केले. त्या उलट मेरीचे. ती धनिक कुटुंबात जन्मलेली आणि उच्चभ्रू शाळेत शिकलेली. आपण इतर अमेरिकन मुलींप्रमाणे नसून, अधिक गुणसंपन्न आहोत, अशी तिची समजूत होती. त्यामुळे दुसऱ्यांचे ऐकणे, इच्छांना मुरड घालणे तिला जमणे कधीच शक्‍य नव्हते. असे हे लिंकन आणि मेरी दोन टोकांवरचे! प्रामाणिकपणा आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणे, ही लिंकनची बलस्थाने होती. मेरी आणि लिंकन यांचा प्रेमविवाह. लिंकन दिसायला धड नव्हता. त्यामुळे मेरीच्या घरच्यांनाही हे लग्न मान्य नव्हते. पण त्याच्याकडे अशी काही कौशल्ये होती की त्या बळावर तो अमेरिकेचा अध्यक्ष होणार, याची मेरीला कल्पना होती. त्यामुळेच तिने लिंकनशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. (बापरे, केवढी ही दूरदृष्टी! प्रत्येक स्त्रीला पुरुषाच्या भविष्याचा अंदाज येऊ लागला तर..?) मेरीच्या अशा स्वभावामुळे तिच्याबरोबर आपला संसार होणार नाही, असे लिंकनला वाटत होते. त्याने मेरीला पत्र लिहिले, ""तू दिलेल्या विवाहाच्या प्रस्तावाचा मी विचार केला आहे; पण लग्न करण्याएवढे माझे तुझ्यावर प्रेम नाही. त्यामुळे लग्नाचा बेत आपण रद्द करू.'' लिंकनने हे पत्र लिहिले खरे; पण मेरीला त्याने तोंडीच नकार द्यावा, असा लिंकनच्या मित्रांचा आग्रह होता. यात बरेच दिवस गेले. नकार देण्याचा दिवस आला, त्यादिवशी लिंकन लग्नाला होकार देऊन बसला. लग्न झाल्यानंतर मेरी आणि लिंकन वसतिगृहात राहायला गेले. ते खानावळीत जेवत असत. मेरीला श्रीमंती थाटात जगायची सवय. तिला वसतिगृहातलं उपरं जीवन नकोसं झालं. ती सारखी कटकट, कुरकूर करू लागली. लिंकनवरही ती अनेकदा चिडत असे. एकदा तर रागाच्या भरात तिने लिंकनला गरम कॉफीचा कप फेकून मारला होता. (पुरुषांनो, बघा) अशा परिस्थितीतही लिंकन शांत राहात असे. आपण नवऱ्यावर रागावूनही तो काहीच बोलत नाही. प्रत्युत्तर देत नाही, याचा मेरीला भयंकर राग येत असे.ती अनेकप्रकारे लिंकनला छळत असे. त्याच्या वागण्या-बोलण्यातले दोष दाखवून त्याला हिणवत असे. माणसाने कसे ताठ, छाती पुढे काढून चालावे, चालीत जोश, शान असावी, असे ज्ञान ती लिंकनसमोर पाजळत असे. तुझे कान फताडे आहेत, नाक वाकडं आहे. तू ताड-माड आहे. तुझं डोकं फार लहान दिसतं-एखाद्या लांब काठीवर लहान भांडं ठेवल्यासारखं वाटतं, अशा बोचणाऱ्या शाब्दिक टपल्याही ती मारत असे. मेरीच्या अशा बोलण्याने लिंकन दुखावला जायचा; पण त्याने कधी मेरीवर राग काढला नाही. (किती ही सहनशीलता? आहे एवढी कुणाकडे?)मुलगा झाल्यावर लिंकनने घर विकत घेतले. घर अतिशय टुमदार होते; पण तेही मेरीला आवडले नाही. म्हणून ती त्या घराला "दीड मजली' घर म्हणत असे. लिंकनच्या गृहजीवनाविषयी त्याच्या मित्रांना कल्पना होतीच; पण मेरीची आरडाओरड, आदळआपट हे परिसरातील लोकांनाही परिचयाचे झाले होते. मेरीच्या अशा स्वभावामुळे लिंकन सहसा कुणाला घरी बोलावत नसे. मेरी असे वागत होती; परंतु लिंकनच्या मनात तिच्याविषयी कायमच ओढ आणि प्रेम दाटून असायचे. किंबहुना मेरीलाही लिंकनविषयी थोडे की होइना प्रेम होते, असे म्हणावे लागेल. कारण त्यांच्यातील पती-पत्नीचे नाते शेवटपर्यंत टिकून राहिले. मेरी आणि लिंकन यांच्यातील विचारविश्‍व सर्वस्वी भिन्न होते. मेरीला राजकारणात रस होता. चैनीची तिला भयंकर हौस होती आणि सामाजिक प्रतिष्ठेची हावही! तर लिंकन अतिशय प्रामाणिक. गरीबीची जाणीव असल्याने काटकसरी होता. दोघांच्या विचारसरणीतील भेदामुळेच कदाचित मेरी लिंकनला त्रास देत असावी. मेरीच्या अशा विक्षिप्त स्वभावाचा लिंकनच्या भवितव्यावर काडीचाही परिणाम झाला नाही. तो अमेरिकेचा अध्यक्ष झालाच. किंबहुना मेरीने त्याचा संसार नेटका (शांतपणे) केला असता, तर कुणी सांगावे लिंकन जन्मभर वकील म्हणूनच जगला असता...
आता मेरीला काय म्हणणार, चांगले की वाईट?

Tuesday, January 29, 2008

पाकिस्तानात संगीताला विरोध म्हणजे "आटे में नमक'

पाकिस्तानात संगीताला विरोध म्हणजे "आटे में नमक'

पाकिस्तान हा भारताचा कधीकाळी भाग होता. फाळणीनंतर आता तेथील संगीताची स्थिती काय असेल, याबाबत माझ्या मनात नेहमीच कुतूहल आहे. मी खरेतर जातीभेद मानत नाही; परंतु शास्त्रीय संगीत समृद्ध करण्यात मुस्लिम कलाकारांचा मोलाचा वाटा आहे, असे माझे ठाम मत आहे. पाकिस्तान आज अराजकाच्या गर्तेत सापडला आहे. तेथील सांस्कृतिक क्षेत्राला मूलतत्त्ववाद्यांपासून धोका निर्माण झाला आहे. तेथील संगीताबद्दल खास करून शास्त्रीय संगीताबद्दल कुतूहल आहे. प्रख्यात गझल गायक मेहदी हसन यांचे चिरंजीव असिफ मेहदी मैफलीसाठी नुकतेच पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे परस्परांविषयीची दृष्टिकोन बदलले आहेत. त्याप्रमाणे संगीत क्षेत्रही बदलले आहे का, तेथील सांगीतिक माहोलमध्ये काही फरक पडलाय का, असं विचारल्यावर असिफ म्हणाले, ""संगीताची उत्पत्ती हीच मुळात भारतात झाली आहे. पाकिस्तानचेही तसेच आहे. त्यामुळे संगीतात फारसा बदल झालेला नाही. भारतात जे शास्त्रीय संगीत-रागरागिण्या आहेत. त्याच तिथे आहेत; परंतु भारतात संगीताला "मजाक' समजले जात नाही. या संदर्भात मला भारत आणि पाकिस्तानच्या संगीतात थोडा फरक जाणवतो. बाकी सगळे सारखेच आहे. माहोलही सारखाच आहे.'' भारतात संगीत आणि कलाकाराला भरपूर मानसन्मान मिळतो. तसा पाकिस्तानातील कलाकारांना मिळत असेल का? संगीत क्षेत्राकडे पाहण्याचा सरकार आणि लोकांचा दृष्टिकोन कसा असेल, याविषयी मला जाणून घ्यायचं होतं... ""पाकिस्तानमध्येही खूप आवडीने संगीत ऐकले जाते. त्यामुळे जनता आणि सरकारकडूनही प्रोत्साहन दिले जाते. मानसन्मान मिळतो. याचे एक चांगले उदाहरण म्हणजे मेहदी हसन आहेत. तिथे आजही ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत,'' असं असिफनं मला सांगितलं. गझल गायकी हा उपशास्त्रीय संगीताचा प्रकार आहे; पण सध्या त्याला "सुगम संगीता'चे स्वरूप आले आहे, या माझ्या मतावर आसिफनंही होकाराचा शिक्का मारला. ""आज-काल गझल म्हणून जे गायले जाते त्याला गझल नव्हे; गीत म्हणायला हवे. गझलचा जो "मिजाज' आहे त्यात भाव, शब्द आला महत्त्व आहे. शास्त्रीय संगीताची जानकारी असणेही तेवढेच आवश्‍यक आहे. ती नसेल तर गझलेचा भावार्थ लोकांपर्यंत पोचविता येणारच आहे. आज जे गायले जात आहे, ती गझल नाही.'' ही असिफची स्पष्टोक्ती! आजचे संगीत "ग्लोबल' झाले आहे. "फ्युजन'चा जमाना आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत किंवा आशियाई संगीत यात पॉप, रॉक आदींचा वापर वाढू लागला आहे. याचा शास्त्रीय संगीतावर काही परिणाम होईल, अशी भीतीसंगीताचा विचार करणारा प्रत्येकजण उगाचच करीत असतो. माझ्या भीतीवर असिफनं फार मार्मिक उत्तर दिलं, ""शास्त्रीय संगीतावर कोणताच परिणाम होणार नाही. कारण ते सत्य आहे. सत्य हे चिरंतन असते. संगीत क्षेत्रातील "फ्युजन' निश्‍चितच चांगले आहे. त्यातून चांगले संगीतच आपल्याला मिळेल. एक उदाहरण देतो. पूर्वी उपचारासाठी संगीताचा वापर केला जायचा-आजही केला जात आहे. माझे आजोबा इस्माईल खॉं हे "जिल्फ' नावाचा राग गाऊन लहान मुलांची पोटदुखी बरी करायचे. भारतातील इंदूर संस्थानच्या महाराजांच्या पुतणीला कर्करोग होता. एका संगीतकाराने तानपुऱ्याच्या झंकाराने तिला बरे केले. संगीताचे हे माहात्म्य आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीत कधीही लोप पावणार नाही.'' पाकिस्तानात मूलतत्त्ववाद्यांचे वर्चस्व वाढत आहे. त्यांना संगीत मान्य नाही, असे बातम्यांमधून ऐकायला वाचायला मिळतं. सत्य जाणून घ्यायचं होतं म्हणून याविषयी मी असिफला विचारलं. ""पाकिस्तान हा इस्लामिक देश असल्याने तेथे अनेक लोक गायन-वादनाला चांगले मानत नाहीत. हे खरे आहे; परंतु लोकप्रियतेचा विचार केला तर तेथील नव्वद टक्के लोकांना संगीतात रस आहे. या प्रमाणातच आम्हालाही तिथे प्रतिसाद मिळतो. संगीत मान्य नाही, असे खूप कमी लोक आहेत. त्यांच्या तीव्रता "आटे में नमक' अशी आहे. या लोकांच्या विरोधामुळे पाकिस्तानातील संगीत कमी झालेले नाही. किंबहुना त्यात वाढच झाली आहे,'' अशी टिपण्णी असिफनं केली. त्यावर मी म्हटलं, अशा लोकांच्या विरोधामुळे संगीतकार, गायक यांच्यावर पाकिस्तान सरकारकडून बंधने लादली जातात का? असिफनं सांगितलं, ""अजिबात नाही. उलट कलाकारांना प्रोत्साहन देणे, हे तेथील सरकारचे धोरण आहे.''या संवादानंतर मेहदी हसन आणि स्वत:च्या काही अप्रतिम गझलाही असिफनं सादर केल्या.
क्‍या बात है?... मेहदी हसन यांचीच याद आली...!

Monday, January 21, 2008

पिया बिन नहीं आवत चैन...

भक्‍ती, प्रेम, विरह या भावना झिंझोटी राग व्यक्त करतो. पण झिंझोटीतील विरह आक्रोश करीत नाही आणि त्यातील प्रेमाला दिखाऊपणा नाही. या भावना एखाद्या विश्‍वासाच्या आधारावरच व्यक्त होतात. अब्दुल करीम खॉं यांची "पिया बिन नहीं आवत चैन' ही झिंझोटी रागातील ठुमरी त्याचे उत्तम उदाहरण आहे. या ठुमरीबद्दलची एक आठवण सैगलने आपल्या चरित्रात सांगितली आहे. खॉंसाहेबांची ही ठुमरी 1931 मध्ये रेकॉर्ड झाली आणि प्रचंड गाजली. त्यानंतर 1935 मध्ये हीच ठुमरी "देवदास' या चित्रपटात वापरण्यात आली. मात्र, ती गायली सैगलने! सैगलने अप्रतिम गायलेली ही ठुमरी खॉंसाहेबांच्या दोस्तांनी ऐकली आणि खॉंसाहेबांनीही ती ऐकावी, असा हट्ट त्यांच्याकडे धरला. खॉंसाहेबांनी आपल्या 63 वर्षांच्या आयुष्यात कधीही सिनेमा पाहिला नव्हता. परंतु, दोस्तांच्या आग्रहाखातर ते "देवदास' पाहण्यासाठी गेले आणि त्यातील सैगलने गायलेली ठुमरी ऐकून ओक्‍साबोक्‍शी रडले. झिंझोटीतील आर्तता आणि सैगलच्या गायकीतील भावार्तता यांना खॉंसाहेबांकडून मिळालेले हे एक प्रशस्तिपत्रच म्हणावे लागेल. सिनेमा पाहिल्यानंतर खॉंसाहेबांनी सैगलाचा पत्ता शोधला. एकदिवस त्याच्या घरी गेले आणि त्याला ती ठुमरी अनेकवेळा गायला सांगितली. पुन्हा भेटू म्हणून त्यादिवशी खॉंसाहेबांनी सैगलाचा निरोप घेतला. पुन्हा मात्र त्यांची कधीही भेट होऊ शकली नाही. पहिली भेट हीच त्यांची शेवटची भेट ठरली. कारण महिनाभरातच खॉंसाहेबांचे अचानक निधन झाले. पुढे 1938 मध्ये अलाहाबादला शास्त्रीय संगीत समारोह झाला. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या संगीत महोत्सवास हजेरी लावली. परंतु खॉंसाहेबांची अनुपस्थिती प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जात होती. त्यावेळी त्यांच्या आठवणीने व्याकूळ होऊन सैगलने "पिया बिन नहीं आवत चैन' ही ठुमरी पेश करून खॉंसाहेबांना आदरांजली वाहिली.

Sunday, January 13, 2008

धन्य ती गायनी कळा!


म्युझिक थेरपीचं खरं तर आज स्तोम माजविलं जात आहे, असं मला वाटतं कारण तेवढी जाण असलेले कलाकार आहेत का आणि जे आहेत ते असला उद्योग करतात का? हा खरा प्रश्‍न आहे. याविषयी मला एक किस्सा वाचलेला आठवतो. दगडाला "रडू' येणे म्हणजे काय असतं, याचा प्रत्यय हा किस्सा वाचल्यानंतर येतो....

दुसरे महायुद्ध सुरू होण्याआधी (1933) प्रख्यात शास्त्रीय गायक ओंकारनाथ ठाकूर एकदा युरोपमध्ये संगीत दौऱ्यावर गेले होते. याच दौऱ्यात त्यांना इटलीत जाण्याचा योग आला. मुसोलिनी त्यावेळी इटलीचा सर्वेसर्वा होता. त्याला भारतीय शास्त्रीय संगीत ऐकविण्याची ओंकारनाथांची इच्छा झाली. मुसोलिनीच्या सचिवामार्फत त्यांनी मुसोलिनीला गाणं ऐकविण्याची परवानगी मिळविली. पाच मिनिटात गाणं संपवायचे ही अट होती. पंडितजींनी ती मान्य करून मुसोलिनीसमोर तोडी राग गाण्यास सुरवात केली. वेळ संपत आली; पण मुसोलिनीला गायनाने भारावून गेला होता. त्यानं पंडितजींना खुणेनेच गात राहायला सांगितलं. तोडी सुरूच होता. या रागातील करुण स्वरांनी हुकूमशहा मुसोलिनी हेलावला. त्याचे डोळे पाण्याने डबडबले... पण असं विरघळून जाणं आपल्याला परवडणारं नाही, हे त्याच्या लक्षात आल्यावर त्यांनं ओकारनाथांना गाण थांबविण्याची विनंती केली. मुसोलिनीला निद्रानाश हा आजार होता. तोही पंडितजींच्या गायनाने बरा झाल्याचे सांगितले जाते.

Tuesday, January 8, 2008

पाकिस्तानात संगीताला विरोध म्हणजे आटे में नमक

राजकीय आणि सामाजिक समस्या पाकिस्तानात नेहमीच भेडसावत राहिल्या आहे. आता तेथील सांस्कृतिक क्षेत्राला मूलतत्त्ववाद्यांपासून धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील संगीत क्षेत्राची स्थिती नेमकी कशी आहे, याविषयी प्रख्यात गझल गायक मेहदी हसन यांचे चिरंजीव असिफ मेहदी यांच्याशी केलेली ही बातचीत. असिफ मेहदी सध्या पाकिस्तानहून पुण्यात आलेले आहेत.



  1. - भारत-पाक फाळणीनंतर या देशांचे परस्परांविषयीची दृष्टिकोन बदलले आहेत. त्याप्रमाणे संगीत क्षेत्रही बदलले आहे का, तेथील सांगीतिक माहोलमध्ये काही फरक पडलाय का?:


संगीताची उत्पत्ती हीच मुळात भारतात झाली आहे. पाकिस्तानचेही तसेच आहे. त्यामुळे संगीतात फारसा बदल झालेला नाही. भारतात जे शास्त्रीय संगीत-रागरागिण्या आहेत. त्याच तिथे आहेत. परंतु भारतात संगीताला "मजाक' समजलं जात नाही. यासंदर्भात मला भारत आणि पाकिस्तानच्या संगीतात थोडा फरक जाणवतो. बाकी सगळं सारखंच आहे. माहोलही सारखच आहे.





  • - भारतात संगीत आणि कलाकाराला भरपूर मानसन्मान मिळतो. तसा पाकिस्तानात मिळतो का? संगीत क्षेत्राकडे पाहण्याचा सरकार आणि लोकांचा दृष्टिकोन कसा आहे?


पाकिस्तानमध्येही खूप आवडीनं संगीत ऐकलं जातं. त्यामुळे जनता आणि सरकारकडूनही प्रोत्साहन दिलं जातं. मानसन्मान मिळतो. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे मेहदी हसन आहेत. तिथे आजही ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.





  • - गझल गायकी हा उपशास्त्रीय संगीताचा प्रकार आहे. पण सध्या त्याला "सुगम संगीता'चं स्वरूप आलंय. याबाबत आपलं मत काय आहे?


तुम्ही म्हणता ते खरं आहे. आज काल गझल म्हणून जे गायले जाते त्याला गझल नव्हे; गीत म्हणायला हवे. गझलचा जो "मिजाझ' आहे त्यात भाव, शब्द आला महत्त्व आहे. शास्त्रीय संगीताची जानकारी असणेही तेवढेच आवश्‍यक आहे. ही जानकारी नसेल तर गझलेचा भावार्थ लोकांपर्यंत पोचविता येणारच आहे. आज जे गायलं जात आहे, ती गझल नाही, असंच मी म्हणेल.





  • आजचं संगीत "ग्लोबल' झालंय. फ्युजनचा जमाना आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत किंवा आशियायी संगीत यात पॉप, रॉक आदींचा वापर वाढू लागला आहे. याचा शास्त्रीय संगीतावर काही परिणाम होईल, असे आपल्याला वाटते का?


शास्त्रीय संगीतावर कोणताच परिणाम होणार नाही. कारण शास्त्रीय संगीत सत्य आहे. सत्य हे चिरंतन असते. संगीत क्षेत्रातील "फ्युजन' निश्‍चितच चांगले आहे. त्यातून चांगलं संगीतच आपल्याला मिळेल, असं माझं मत आहे. एक उदाहरण देतो. पूर्वी उपचारासाठी संगीताचा वापर केला जायचा-आजही केला जात आहे. माझे आजोबा इस्माईल खॉं हे "जिल्फ' नावाचा राग गाऊन लहान मुलांची पोटदुखी बरी करायचे. भारतात इंदूर संस्थान होते. या संस्थानच्या महाराजांच्या पुतणीला कर्करोग होता. एका संगीतकाराने तानपुऱ्याच्या झंकाराने तिला बरे केले. संगीताचं हे माहात्म्य आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीत कधीही लोप पावणार नाही.





  • - पाकिस्तानात काही लोकांना संगीत मान्य नाही, असं बातम्यांमधून ऐकायला वाचायला मिळतं. सत्य काय आहे? आपण याबाबत काय विचार करता?


हे खरं आहे. पाकिस्तान हा इस्लामिक देश असल्याने तेथे अनेक लोक गायन-वादनाला चांगलं मानत नाहीत. परंतु लोकप्रियतेचा विचार केला तर तेथील नव्वद टक्के लोकांना संगीतात रस आहे. या प्रमाणातच आम्हालाही तिथे प्रतिसाद मिळतो. संगीत मान्य नाही, असे खूप कमी लोक आहेत. त्यांच्या तीव्रता "आटे में नमक' अशी आहे. या लोकांच्या विरोधामुळे पाकिस्तानातील संगीत कमी झालेले नाही. किंबहुना त्यात वाढच झाली आहे.





  • - अशा लोकांच्या विरोधामुळे संगीतकार, गायक यांच्यावर पाकिस्तान सरकारकडून बंधने लादली जातात का?


अजिबात नाही. उलट कलाकारांना प्रोत्साहन देणे, हे तेथील सरकारचे धोरण आहे.





- संतोष शाळीग्राम